Marathi Kavita Mrutyu : शेवटी मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी निरनिराळ्या प्रथा समाजात रूढ आहेत. माणूस मरतो पण आत्मा मरत नाही अस म्हणतात. अश्याच एका आत्माच्या जागी स्वताला ठेवून पहिले तर……. विचार थोडासा वेगळा वाटतो पण, विचार करण्यासारखा हा विषय नक्कीच आहे. समजा अश्याच एका आत्म्याने सरणावर असताना स्वत: वर कविता लिहिली तर?

Marathi Kavita Mrutyu
मृत्यू
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो
बहुतेक आसवांच्या धारेने
मी चिंब चिंब भिजलो होतो.
शेवटची आंघोळ
ती होती गरम पाण्याची
ज्याला त्याला घाई होती
मला डोळे भरून पाहण्याची.
ज्यांच्या खांद्यावर माझं
गेल होत बालपण
त्यांनीच मला उचलून घेतलं
पुन्हा एकदा खांद्यावर.
जवळचे सारे होते त्यात
ती ही आली होती
“न्हेऊ नका” मोठयाने ओरडून
ती ही मग रडत होती.
सरणावर झोपूनही मी
मौन पहा हे पाळल होतं
जीव लावणार्या माझ्यानीच
शेवटी मला जाळल होतं.
कवि – मनिष महादेव जोशी
हे देखील वाचा – मराठी कविता